मांडोगण फाटा ते पेडगाव रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे…
विश्व निर्माता प्रेस पोर्टल :अहिल्यानगर
सोमवार १० नोहेंबर २०२५
अहिल्यानगर:सध्या मांडोगण फाटा पेडगाव रस्त्याचे काम सुरू आहे,परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या रस्त्यावर वाहनांची रहदारी अधिक आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागते. वाहनांच्या उडणाऱ्या धुळीमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे.
या रस्त्यावर वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते. दुचाकी चारचाकी वाहनांना समोरून मागून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे केव्हाही अपघात घडू शकतो. या अपघातांना जवाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. दुसरी बाब म्हणजे रस्त्यावर पुलाचे काम उकरून सुरू केले आहे. त्याठिकाणी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकते.
मांडोगण ते पेडगाव मार्गाचे दुहेरी महामार्गात रुपांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरण करण्यात येत आहे, मात्र अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. कधीतरी कुडे पाणी मारले जाते तर काही दिवसांनीच पाणी फवारले जाते. याने धूळ थांबत नसते. त्या साठी नित्य क्रम चालू ठेवावा अशी मागणी युवक व नागरिक विद्यार्थी करत आहेत.
मांडोगण ते श्रीगोंदा व पेडगाव हा सुमारे ४३किलोमीटर रस्ता खोदून ठेवण्यात आला असून त्यावर मुरूम टाकण्यात आले आहे. या मुरमावरूनच वाहतूक सुरू आहे. मोठी वाहने धावतात.तेव्हा प्रचंड धूळ उडून समोरचे वाहन काही काळासाठी दिसेनासे होत असते. प्रसंगी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. रस्त्याचे खोदकाम करून मुरूम टाकण्यात आला असला तरी या कच्च्या रस्त्यावर पाणी मारले जात नाही.
धुळीमुळे होते श्वसनाची क्षमता कमी धूळ श्वासावाटे शरीरात जाते. त्यानंतर धूलिकण श्वसनसंस्थेत जमा होतात. हे धूलिकण श्वसनातून शरीरात, फुप्फुसात श्वसननलिकेत जातात. अॅलर्जीचा त्रास असणाऱ्यांना सर्दी, खोकला, कफ होणे धाप लागणे असे त्रास होतात.तर काहींना सर्दी खोकला आणि घशात दुखणे असे त्रास होत आहेत. या धूलिकणाचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसनाची क्षमता कमी होत जाणे होय.
रस्त्या शेजारील कपाशीचे व नुकसान सुरू असलेले काम व त्यावरून होणारी सततची वाहतूक यामुळे दिवसभर धूळ उडत असते. परिणामी रस्त्या शेजारी असलेल्या शेतातील कपाशीवर याचा वाईट परिणाम होत आहे़. कांदा ,कपाशीवरील बोंडांवर धुळीचा थर साचल्याने पांढरी शुभ्र कपाशी काळवंडत आहे़ परिणामी बाजारात गेल्यावर या मालाला कमी भाव मिळणार तसेच नवीन पात्या फुटणे सुरू आहे.
त्याच्या वाढीवरही परिणाम होत आहे़ सुरू असलेले काम कंत्राटदाराने आपल्या नियोजित वेळतच पूर्ण करावे मात्र शाळेतील विद्यार्थी नागरिकांना व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही़ याची खबरदारी घेऊनच काम करावे व दिवसातून दोनदा या मुरूमावर पाणी टाकावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे़.
