श्रीगोंदा नगरपालिकेचा २२५ कोटींचा अर्थसंकल्प सादर; सिद्धेश्वर घाट विकासाचा प्रश्न मात्र प्रलंबित
विश्व निर्माता प्रेस पोर्टल
रविवार ८ मार्च २०२६
जिल्हा प्रतिनिधी: -श्रीगोंदा नगरपालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल २२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत. या भव्य अर्थसंकल्पामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असली, तरी शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असलेल्या सिद्धेश्वर घाटाच्या स्वच्छता व विकासाचा प्रश्न मात्र अद्यापही प्रलंबितच असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरातील सिद्धेश्वर घाट येथे दररोज दशक्रिया विधींसह धार्मिक विधी पार पडतात. मात्र घाट परिसरात साचलेले घाण पाणी, गटारी व ड्रेनेजचे पाणी थेट वाहत येणे, अस्वच्छता, दुर्गंधी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दशक्रिया विधीसारख्या भावनिक प्रसंगी कुटुंबीयांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व कार्यकर्ते दशक्रियाविधी निमित्त घाटावर येतात तेव्हा या ठिकाणी स्वच्छता करणे, ड्रेनेज लाईनला स्वतंत्र पाईप टाकणे, झाडे लावणे, कावळ्यांसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे आदी विषयांवर चर्चा करतात मात्र त्या चर्चा प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे दिसून येत नाही, अशी टीका स्थानिकांकडून होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ‘काकस्पर्श समिती’ सिद्धेश्वर घाट परिसरात आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. समितीचे अध्यक्ष बाळू बाजीराव खेतमाळीस यांनी सांगितले की, “सिद्धेश्वर घाट हा केवळ धार्मिक विधींचा नाही, तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे. अस्वच्छता व दुर्गंधी व स्वच्छ पाण्याच्या अभावामुळे काकस्पर्श होत नसल्याने शहरातील दशक्रिया विधी आढळगाव, सिद्धटेक, कोळगाव आदी ठिकाणी नेले जातात. त्यामुळे नगरपरिषदेने तातडीने स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्थापन, वृक्षारोपण व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. हेच आजवर येथे झालेल्या दशक्रिया विधींना खरी श्रद्धांजली ठरेल.”
अर्थसंकल्पात सिद्धेश्वर घाटाच्या विकासासाठी स्वतंत्र तरतूद करून तातडीने कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली जात आहे. २२५ कोटींचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या नगरपालिकेने आता केवळ कागदोपत्री आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून शहराचा व सिद्धेश्वर घाटाचा कायापालट करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
🔴🟢🟠🟣
